मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय ! Covid रुग्णालयात दाखल होण्याच्या नियमात केला बदल; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याच्या नियमांत बदल केला आहे. याबाबत नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. कोविड रुग्णालयात किंवा सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असणे बंधनकारक नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय खूप मोठा आहे. यामुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होणार आहे.

एखाद्याला कोरोनाची लक्षणे दिसल्यावर सुरुवातीला त्या रुग्णाची टेस्ट केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. पण आता कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी रुग्णाची कोरोना चाचणी बंधनकारक नाही. कोरोनाच्या संशयित रुग्णांना संशयित रुग्णांच्या वॉर्डात ठेवावे. त्या रुग्णाला आवश्यक औषधं, ऑक्सिजन अशी अत्यावश्यक सेवा द्यावी. तो रुग्ण दुसऱ्या शहरातील असला तरी त्याला या सेवा मिळाल्या पाहिजेत. रुग्ण आपले ओळखपत्र दाखवू शकला नसला तरी त्याला रुग्णालयात भरती करण्यास नकार देऊ नये, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. रुग्णालयातील भरती गरजेनुसार असावी, असे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. कोरोना निदानासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. पण या चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत खूप वेळ जातो. कधीकधी रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर असते, ही रिपोर्ट येण्याआधीच वेळेत उपचार न मिळाल्याने त्या रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय खूप मोठा आहे.