Coronavirus : ‘एक देखील रूग्ण तपासणी आणि उपचाराविना हॉस्पीटलमधून परत जाता कामा नये’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन  –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसंच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठवण्यात येऊ नये असे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनामार्फत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, ‘अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोव्हिड-१९ लक्षणं नसलेल्या परंतु कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोरोना निगा केंद्रामध्ये (कोव्हिड केअर सेंटर – सीसीसी) पाठवावे. खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी राहण्याचा त्यांना सल्ला द्यावा’.

मुंबईमधील कोरोना संसर्गित रुग्णांची वाढती संख्या पाहता या रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात यावे. कोणताही रुग्ण त्यापासून वंचित राहू नये. तसंच इतर आजारांच्या रुग्णांना देखील वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ द्वारे आदेश जारी केला आहे. मुंबई महानगरातील रुग्णवाहिकांचे नियंत्रण मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून करण्यात यावं. यामुळे रुग्णवाहिकांची ने-आण करताना सुसूत्रता येईल असंही आदेशात म्हटलं आहे.

आदेशात पुढं स्पष्ट म्हटलं की, कोणताही रुग्ण मग तो कोरोना संसर्ग संशयित असो वा अन्य आजाराने ग्रासलेला असो, तो रुग्णालयात आल्यावरती तातडीने त्याच्यावर अपघात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर जागेच्या उपलब्धतेनुसार तेथे रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून विलगीकरणाची सोय करून रुग्ण तपासणी करण्यात यावी. मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये एक देखील रुग्ण उपचाराविना परत जात काम नये याची दाखल घेतली पाहिजे, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलयं.

आरोग्य सेवा संचालकांनी रुग्णांची तपासणी, त्याला इतरत्र हलविणे, दाखल करून घेणे किंवा घरी सोडणे याबाबत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, असे आदेश देण्यात आले आहे. मुंबईत असलेल्या रुग्णालयांतील उपलब्ध खाटांच्या अचूक व्यवस्थापनासाठी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाला एक विशिष्ट ओळखक्रमांक देण्यात यावा. हा क्रमांक मुंबई महापालिकेच्या २४ तास कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दिला जावा, त्याशिवाय रुग्णाला दाखल करून घेतलं जाऊ नये असं देखील आदेशाच्या अधिसूचनेत दिलं आहे. या कार्यपद्धतीमुळे कोणत्या रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत. त्याची माहिती मिळू शकेल असे आदेशात सांगण्यात आले.

कोव्हिड-१९ संसर्गित संशयित रुग्णांना उपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येऊन त्यांना दाखल करण्यात यावे आणि त्यांचा नमुना अहवाल १२ तासात मिळेल अशी व्यवस्था करावी. रुग्णाला असलेल्या त्रासानुसार त्याला कोव्हिड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) किंवा डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (डीसीएच) येथे हलविण्यात यावे. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाने अर्धा तासाच्या आतमध्ये मृतदेह वॉर्डमधून हलविण्याबाबत कार्यवाही करायची आहे. तसंच मृतदेहावर अंत्यसंस्कार करायची जी कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे. त्यानुसारच १२ तासाच्या आत ते पूर्ण करायचे आहे. असं देखील आदेशात म्हटलं आहे.