दिल्ली हिंसाचार : IB कॉन्स्टेबलचा खून करून मृतदेह नाल्यात फेकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून ईशान्य दिल्लीमध्ये सीएएवरून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून यामध्ये आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हिंसाचारात दंगेखोरांनी आयबी कॉन्स्टेबलचा खून करून मृतदेह एका नाल्यात फेकून दिल्याचे समोर आले आहे. आयबी कॉन्स्टेबलचा मृतदेह चांद बाग पुलावरील नाल्यातून काढण्यात आला.

अंकित शर्मा असे खून झालेल्या आयबी कॉन्स्टेबलचे नाव असून ते खजुरी येथील रहिवाशी आहेत. मंगळवारी संध्याकाळी ते ड्युटीवरून घरी परतत होते. चांद बाग पुलावर काही लोकांनी त्यांना घेरलं असा आरोप केला जात आहे. त्यांना मारहाण करुन त्यांचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर दंगेखोरांनी त्यांचा मृतदेह पुलावरील नाल्यात फेकून दिला.

अंकित शर्मा यांचे कुटुंबीय त्यांचा मंगळवार पासून शोध घेत होते. अंकित यांचे वडील रविंदर शर्मा हे देखील आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. त्यांनी सांगितले की, अंकितला मारहाण करून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठवला. रविंद्र शर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अंकित हे 2017 मध्ये आयबीमध्ये भरती झाले होते. त्यांचा अद्याप विवाह झालेला नाही. त्याच्यासाठी स्थळ पाहण्याचे काम सुरु होते.