‘देवेंद्र फडणवीस हे पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत?’

मुंबई : राज्यात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही भ्रष्टाचार होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यासंदर्भात त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडून ‘मी पुन्हा येईन’ असे वक्तव्य केले जात आहे. त्यावर कॉमेडियन कुणाल कामरा याने टोला लगावला.

कुणाल कामरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात आपली भूमिका मांडत असतो. त्याने आज ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने फडणवीस यांना उद्देशून ट्विट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘मी पुन्हा येईन’, असे वक्तव्य केले जात आहे. त्यावर बोलताना कामराने ट्विट करत म्हटले, की ‘मृत्यूनंतर आपल्यासोबत काय होते हे मला माहिती नाही. वेळ ही संकल्पना भविष्यात कशापद्धतीने वापरली जाईल याची मला खात्री नाही. तसेच उद्याचा दिवस खरेच उजाडेल का हेदेखील मला माहिती नाही. पण मी एक गोष्ट खात्रीशीर सांगतो, की देवेंद्र फडणवीस हे पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत’.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मनसुख हिरेन प्रकरण, सचिन वाझे प्रकरण आणि आता मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. तसेच ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यातच आता मुख्यमंत्रिपदाबाबत कामरा याने ट्विट करत फडणवीसांना टोला लगावला.