मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा, म्हणाले – ‘लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार ?’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिला आहे. मराठा आरक्षणावरुन होणारे राजकारण थांबायला हवे. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करावा. नरेंद्र पाटलांनी आज अण्णासाहेब फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी त्यांच आयुष्य मराठा समाजासाठी अर्पण केले आहे. आपल्याकडे पुढची पिढी आशेने पाहत आहे. त्यामुळे मला नेत्यांना विनंती करायची आहे की, लोकांचा अंत पाहू नका, एकदा का उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार? हा उद्रेक एक ना एक दिवस नक्की होईल, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

सातारा येथे अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या स्थापना कार्यक्रमात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील एकाच मंचावर उपस्थित होते.

यावेळी खासदार उद्यनराजे यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वांना वाटते की मराठा समाज फार सधन आहे. मात्र, मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती वाईट आहे ही वस्तुस्थिती स्वीकारायला हवी. आज जास्त मार्क मिळवूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय असल्याचे ते म्हणाले.