‘…पण तेव्हा आपण टाळ्या वाजवत, दिवे पेटवत राहिलो’; सीतारामन यांच्या पतीकडूनच ‘घरचा’ आहेर, केली मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यावरून आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘सरकारकडून स्वत:ला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळण्याचा प्रयत्न होत आहे. कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे’, असे परकला प्रभाकर यांनी सांगितले.

देशभरात आरोग्य सेवा-सुविधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन, व्हेंटिलेटर/ऑक्सिजन बेड्स, कोरोना प्रतिंबधक लसींचा तुटवडा यांसारख्या सेवांचा अभाव त्यामुळे केंद्रावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता याच मुद्यावरून परकला प्रभाकर यांनी म्हटले, की ‘लॉकडाऊन हा कोरोना संकटावरचा उपाय नाही, लसीकरण हाच कोरोना संक्रमण रोखण्याचा उपाय आहे. लॉकडाऊनच्या वेळेचा वापर आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी व्हायला हवा होता. पण त्यावेळी आपण दिवे पेटवत राहिलो, टाळ्या-थाळ्या वाजवत राहिलो. कोरोना व्हायरसच्या संकटात वंचितांना मदत करण्याऐवजी सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त होते. सरकारकडून स्वत:ला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळण्याचा प्रयत्न होत आहे’.

तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोना लसीकरणाबद्दल सरकारला काही सल्ले दिले होते. त्यावर केंद्रातील एका मंत्र्याने अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिली. त्यांनी या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. सध्या स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले आहे, असेही प्रभाकर म्हणाले.