खुशखबर ! लवकरच 15 हजार नव्या बँक शाखा सुरु होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने सर्व बँकांना दुर्गम भागात बँकिंग सेवा पोहचवण्याचे निर्देश दिले आहेत. वित्तीय सर्वसमावेशनाला चालना देण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अधिक शाखा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सरकारने बँकिंग सेवा नसलेल्या ठिकाणांची माहिती सर्व बँकांना पुरविली असल्याने जवळपास १५ हजार नवीन शाखा सुरु होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार वित्तीय सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार बँकिंग सेवा नसलेल्या खेड्यांमध्ये १५ किलोमीटर आत बँक शाखा असावी. त्यामुळे येत्या काही काळातच एसबीआय, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय या बँका १४००० ते १५००० नवीन शाखा सुरु करणार असल्याचे समजते. या विस्तारामध्ये ‘एसबीआय’ बँकेकडून १५०० नव्या शाखा सुरु करणार आहे. तसेच इतर खासगी बँकांनी किमान ६०० ते ७०० बँका सुरु कराव्यात, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०१९ अखेर देशभरात १ लाख २० हजार बँक शाखा असून देशभरात एकूण २ लाख एटीएम आहेत. त्यातील ग्रामीण भागात ३५ हजार ६४९ बँक शाखा आहेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ पर्यंत ग्रामीण भागात शाखांचे नेटवर्क केवळ ३ टक्क्यांनी वाढले असून ५२००० पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे बँकिंग सेवा सर्वत्र पोहचवण्यासाठी ग्रामीण भागात किमान ५ लाख ५० हजार बँक शाखा असणे आवश्यक असल्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/