‘त्या’ मेडिकलच्या विद्यार्थ्यांना जादा गुण तातडीनं लागू करा : हायकोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यर्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. मेडिकल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा मुंबईला उच्च न्यायालयाने दिला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात काम केल्यानंतर मिळणाऱ्या जादा गुणांबाबत राज्य सरकारने येत्या आठवडयात अधिसूचना जारी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये या वाढीव गुणांचा दिलासा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेची सबब या कामासाठी देऊ नये, असेही हायकोर्टानं बजावले आहे. डॉ. उमाकांत मारवार यांनी जादा गुणांच्या मागणीबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यामूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे याविषयी सुनावणी झाली. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांमधील वैद्यकीय विद्यार्थी ग्रामीण भागांमध्ये काम करतात. अशा भागांमध्ये किमान तीन वर्ष काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षेत प्रति वर्षी दहा टक्के अतिरिक्त गुण मिळण्याची मुभा आहे.

दरम्यान, पदव्युत्तर अभ्यासक्रमातही पन्नास टक्के जागांमध्ये अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारित नियमावली मागील वर्षी तयार केली आहे. याच धर्तीवर राज्य सरकारनेही अधिसूचना काढून या नियमांची अमंलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.