बुलंदशहरात गोहत्येवरुन 3 डिसेंबरला तणाव निर्माण झाला होता. दरम्यान ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधिकाही घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमावानं पोलीसांवरच हल्ला केला होता. याच हल्ल्यात पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना नसीरुद्दीन शहांनी देशातील घडामोडींवरही भाष्य केलं. ‘देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,’ असं शहांनी म्हटलं. ते एका संकेतस्थळाशी बोलत होते यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
‘सध्या देशात गाईचा जीव माणसापेक्षा जास्त मौल्यवान झाला आहे. गाईचे प्राण पोलीस अधिकाऱ्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरलं आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल’, अशा शब्दांमध्ये त्यांनी देशातील परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली.
देशातील सध्याच्या परिस्थितीचा चीड येते, असंदेखील शहा म्हणाले. ‘कायदा अगदी बिनधास्तपणे हातात घ्यावा, यासाठी लोकांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. याची मला अतिशय चीड येते. देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. लोकांनादेखील याबद्दल संताप वाटला पाहिजे. हे आमचं घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो, असा विचार लोकांच्या मनात यायला हवा,’ असं शहा यांनी म्हटलं.