अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन- भीती आणि मनाचा दुबळेपणा हा कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे. वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हात वारंवार धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीसोबत मनात खंबीरपणा ठेवणे हे चौथे सूत्रही आवश्यक असल्याचे सांगत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी लोकांना कोरोनाविरोधातील लढाई खंबीरपणे लढण्याचे आवाहन केले आहे.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने विखे पाटील महाविद्यालयातील वसतिगृहात सुरु केलेल्या 400 बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण इंदुरीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे चेअरमन भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे पाटील, आण्णासाहेब म्हस्के पाटील, शिर्डी संस्थानचे उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे उपस्थित होते.
यावेळी इंदुरीकर म्हणाले, कोरोनाच्या संकटाने मानवी जीवन क्षणिक करून टाकले आहे. कोरोनाच्या संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली. पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला. रुग्णाला माणसाची आणि समाजाची गरज वाटू लागली आहे. त्यामुळे आता आरोग्याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कोविड केअर सेंटरची माहिती दिली. शिर्डी संस्थानच्या रुग्णालयातून एक हजार बेडची व्यवस्था केली होती. मात्र, वाढती रुग्णांची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण विचारात घेवून हे कोविड सेंटर सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.