जालना : सख्खा भाऊ बनला वैरी, साथीदाराच्या मदतीने केला बहिणीचा खून

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – जमीनीच्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या बहिणीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज (बुधवार) उघडकीस आला आहे. कमलाबाई शाहूराव कोल्हे (वय-55) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. कमलाबाई या मुळच्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथील रहिवासी आहेत.

जालना शहरातील चौधरीनगर परिसरात एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. मात्र, त्यावेळी महिलेची ओळख पटली नव्हती. महिलेच्या अंगावर जखमा आणि रक्त आढळून आल्याने महिलेचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. दरम्यान, पोलिसांनी या महिलेची ओळख पटवल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मृत महिलेच्या सख्ख्या भावानेच जमीनीच्या वादातून या महिलेचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पैठण तालुक्यातील असलेली ही महिला सध्या मुंबईच्या खोपोली परिसरात स्थायिक होती. या महिलेचे आणि तिच्या सहा भावंडामध्ये अंबड न्यायालयात 25 गुंठे जमिनीचा वाद सुरु आहे. न्यायालयीन तारखेसाठी परवा कमलाबाई अंबड न्यायालयात आल्या होत्या.

परत जाण्यासाठी त्या निघाल्या असता जालना शहरातील सुंदरनगर भागात राहणाऱ्या त्यांच्या दोन नंबरच्या भावाने मुक्कामासाठी त्यांना रात्री थांबवून घेतले होते. खरपुडी येथे राहणारा त्यांचा सर्वात लहान भाऊ दीपक पटेकर हा रात्री सुंदरनगर येथे भेटण्यास आला होता. दीपक पाटेकर याने कमलाबाई यांना चौधरीनगर परिसरात ऑटोरिक्षातून घेऊन गेला. त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले.