यंदा जेजुरी गडावर ‘यळकोट यळकोट’चा गजर नाही; भाविकांना 3 दिवस प्रवेशबंदी

पोलीसनामा ऑनलाईन, पुरंदर, दि. 10 डिसेंबर : कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून मंदिरे शासनाने बंद केली होती. ही बंदी काही महिन्यानंतर उठविण्यात आली. त्यामुळे राज्यातील अनेक मंदिरे खुली झाली आहेत. असे असले तरी यंदा जेजुरी गडावर ‘यळकोट यळकोट’चा, गजर होणार नाही. तसेच भाविकांना तीन दिवस प्रवेशबंदी केली आहे. याचे कारणही खास आहे. ते म्हणजे, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कलम 144 नुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे.

कोरोना काळात नंतर शासनाने मंदिरे सुरू केली असली तरी त्यासाठी नियम, अटी, शर्ती घातल्या आहेत. जमावबंदी आदेशामुळे येत्या सोमवारीची सोमवती अमावास्या यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी 12 डिसेंबर ते सोमवार 14 डिसेंबरपर्यंत जेजुरीमध्ये भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केलंय.

येत्या सोमवारी (14 डिसेंबर) सोमवती अमावस्या असल्याने या पार्श्वभूमीवर पेशवे लॉज येथे ग्रामस्थ खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वस्त मंडळ, नगरपालिका प्रशासन यांची संयुक्तिक बैठक पार पडली. या बैठकीत येत्या सोमवारी येणारी सोमवती अमावस्या यात्रा, मंगळवारपासून सुरू होणारा सहा दिवसांचा चंपाषष्टी उत्सव याबाबत चर्चा झाली.

या चर्चेत सोमवती यात्रा रद्द करण्याचा तर, चंपाषष्टी षढरास्त्रोत्सव ही साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सचिव छबन कुदळे, उपाध्यक्ष आबा राऊत, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, रोहिदास माळवदकर ,रामचंद्र माळवदकर ,पंडित हरपळे, माणिक पवार ,अरुण खोमणे ,संजय खोमणेपाटील, बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष संतोष खोमणे, ग्रामस्थ कृष्णा कुदळे, जालिंदर खोमणे, दिलीप मोरे, रवींद्र बारभाई, रमेश बयास, अनिल बारभाई, दिलीप आगलावे, राहुल बयास, राजेंद्र चौधरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी आदी उपस्थित होते.

प्रशासनाच्या आदेश, सूचनांचे पालन करण्यात येईल. तसेच रूढी, परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी केले जातील. मात्र, पालखी सोहळा रद्द केला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार 12 ते 14 डिसेंबरच्या काळात जेजुरीमध्ये येणे टाळावे, असे इनामदार पेशवे यांनी आवाहन केले आहे.