Lasalgaon : पारा घसरल्याने द्राक्ष उत्पादक संकटात

लासलगाव – उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा 7 अंश सेल्सियस पर्यंत खाली घसरल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात आहे हाती आलेला द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकरी शेतात ऊब निर्माण करण्यासाठी शेकोट्या पेटवतांना दिसतात

द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होते भांडवल जास्त लागते त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतात द्राक्षाची पीक हे ऐन थंडीच्या हंगामात बहरण्यास सुरुवात होते आणि अशात दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंदी महासागरातील चक्रीवादळाचा जोर असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे याचा थेट परिणाम निफाड तालुक्यात सलग तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे,वाढ खुंटणे, द्राक्ष कुजने , द्राक्ष झाडाची मुळे चोकअप होणे, द्राक्ष झाडात साखर उतरण्याची प्रक्रिया पुर्णता थांबणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे या थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर अतिरिक्त औषधांची फवारणी केल्यास द्राक्षे निर्यातीला नाकारले जाण्याची भीती असते यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षांना ठिबकद्वारे पाणी देणे द्राक्ष बागेत विशिष्ट अंतरावर शेकोट्या पेटवून द्राक्षे घडांसाठी उबदार वातावरण तयार करतात यामुळे घड सैल होऊन तडे जाणार नाही असे द्राक्ष उत्पादकांना वाटत आहे.

प्रतिक्रिया – सुनील गवळी , ब्राम्हणगाव विंचूर,द्राक्ष उत्पादक शेतकरी

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दर वर्षी करावे लागते यंदा थंडीचे प्रमाण वाढले असून यामुळे आमच्या निर्यातक्षम द्राक्षांवर थेट परिणाम होत आहे या थंडीतून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेकोट्या पेटुन उब निर्माण करण्याचे कामाला दररोज पहाटे करावे लागत आहे