पत्रकारांना ‘कोरोना’ची लस द्यावी, जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंधाची घोषणा केली आहे. दुसरीकडे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करत आहे. सध्या 45 आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पत्रकारांना लस देण्याची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पत्रकारांना लस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी, ही विनंती.

ANI च्या पत्रकाराचे निधन

ANI या वृत्तसंस्थेचे पत्रकार सबाजी मोहन पालकर यांचे मुंबईमध्ये नुकतेच निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान सबाजी पालकर यांचे निधन झाले.