NCP Jitendra Awhad | १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस बंद, ही तर हुकूमशाही, जितेंद्र आव्हाडांचा केंद्रावर निशाणा
मुंबई : खासगी कोचिंग क्लासेसमुळे (Coaching Classes) विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली खासगी क्लासेसची दुकानदारी आणि मनमानी वाढल्याचे म्हणत, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Union Ministry of Education) त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये कोचिंग क्लासेस १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही, असाही एक नियम आहे. यावरून मोठा गोंधळ सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी ही नियमावली म्हणजे हुकुमशाही असल्याचे म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, असे समजते की, १६ वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्यांला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही. कारण की, त्यावर बंदी घातली आहे. तसेच, कोणी कोचिंग क्लासेस घेतल्यास त्यांना १ लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून त्यांचा जादा अभ्यास करून घेण्याची पालक – शिक्षकांची मानसिकता असते. कोचिंग क्लासेस हे नोकरदार आई, वडील- पालकांनाही साह्यभूत ठरत आलेले आहेत. सारासार विचार करता, कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते. असे असताना १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे.
ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे; त्यांना थांबवता कशाला ? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार आहे, याचा अंदाजच न केलेला बरा ! मध्यंतरी घरगुती ट्युशन बंद केल्या होत्या. इथपर्यंत यांची मजल जाईल की म्हणतील, आता घरातच रहा!, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
का लागू करण्यात आली नियमावली
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खासगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्राने शिकवण्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. खासगी कोचिंग क्लासेसचे प्रस्थ वाढले आहे. खासगी कोचिंग क्लासेस चालक खोटी आमिषे आणि फसव्या जाहिराती करून पालकांना आपल्याकडे वळवतात. कायदेशीर चौकटीची गरज आणि अनियंत्रित वाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
काय आहे शिक्षण मंत्रालयाच्या नियमावलीत
- या नियमावलीनुसार आता इयत्ता पहिलीपासून सुरू असलेले शिकवणी वर्ग बंद केले जातील.
- कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही.
- कोचिंग सेंटर्स विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत. पालकांना दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत.
- संस्था १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही.
- विद्यार्थ्यांची नोंदणी ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच होईल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा