नीती आयोगाचे अमिताभ कांत यांचे ‘ते’ विधान धक्कादायक; खा. सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणे कठीण असल्याचे वक्तव्य निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत (NITI Aayog CEO Amitabh Kant) यांनी केले आहे. कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणे सोपे नाही, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी अमिताभ कांत यांच्या वक्तव्याचा निषेध करत हे अतिशय बेजबाबदार विधान असल्याचे म्हटले आहे.

खा. सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भारतात लोकशाहीचे कौतुक जास्त होतंय, हे वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्याचे विधान धक्कादायक आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही व्यवस्थेत हे अतिशय बेजबाबदार विधान आहे. त्याचा तीव्र निषेध. भारतातील लोकशाही व्यवस्थेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

अमिताभ कांत यांनी काय म्हटलं आहे

देशाला स्पर्धात्मक करण्यासाठी आणखी सुधारणांची गरज आहे. परंतु भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणे अवघड जाते. अशा सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. त्या करण्याची इच्छाशक्ती या सरकारने दर्शवली असल्याचे कांत यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्वच क्षेत्रांत कठोर सुधारणा करीत असल्याचे कांत यांनी प्रथमच ‘स्वराज्य’ नियतकालिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, खणिकर्म, कोळसा, कामगार, कृषीसह जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे, मात्र त्या राबवणे कठीण जात आहे. सुधारणांची पुढील लाट राज्यांनी निर्माण केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून कांत म्हणाले, जर 10-12 राज्यांनी विकासदराचा उच्चांक साधला, तर भारतीय उच्च विकासदर गाठण्यात मागे का पडतात, असा प्रश्नच निर्माण होणार नाही, वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या सूचना आम्ही केंद्रशासित प्रदेशांना केल्या आहेत. वीज वितरण कंपन्या अधिक स्पर्धात्मक बनतील आणि स्वस्त विजेचा पुरवठा करतील, असेही कांत यांनी सांगितले.

कृषी सुधारणांची गरज

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी कांत म्हणाले की, ‘कृषी क्षेत्रात सुधारणांची आवश्यकता आहे. किमान हमीभाव बाजार कायम राहणार आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कृषी उत्पादनातून फायदा मिळवण्यासाठी विक्रीचे पर्याय शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे.