म्हातारपणी दरमहा पेन्शन हवंय: जाणून घ्या मोदी सरकारच्या ‘या’ योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वृद्धापळात दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मिळकतीची चिंता वाटत तुम्हाला आताच वाटत असेल. तर आता चिंता करू नका. तुमच्यासाठी अनेक योजना आहेत. कोणत्याही एका योजनेत सहभागी झालात तर वयाच्या ६० वर्षानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल. मोदी सरकारच्या या योजनांमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी खातं उघडलं आहे.

जाणून घ्या मोदी सरकारच्या ‘या’ योजना

अटल पेन्शन योजना
तुम्ही जर सरकारी नोकरीत नसाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन मिळू शकते. पोस्ट ऑफीस किंवा कोणत्याही बँकेत तुम्ही अटल पेन्शनचं खातं उघडू शकता. अटल पेन्शन योजना ही मोदी सरकारची लोकप्रिय योजना आहे. अटल पेन्शन योजनेत १८ ते ४० वयापर्यंतचेच नागरिक गुंतवणूक करु शकतात. १८ वर्षांचा युवक या योजनेत सहभागी झाला तर वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ५ हजार रुपये मिळकतीसाठी त्याला आता दरमहा फक्त २१० रुपये भरावे लागणार आहेत.

पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना
या योजनेअंतर्गत खातं सुरु करणाऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळते. वयवर्ष १८ ते ४० पर्यंतच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेत सहभागी होता येतं. असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सामन्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

किसान मानधन योजना
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पेन्शन उपलब्ध करुन देण्यासाठी किसान मानधन योजना सुरू केली आहे. याअंतर्गत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याला वयाच्या ६० वर्षानंतर कमीत कमी दरमहा ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेत १८ वर्षांचा शेतकऱ्यानं खातं उघडलं तर त्याला दरमहा फक्त ५५ रुपये भरायचे आहेत. तर ज्यांची वय ३० वर्षांहून अधिक आहे त्यांना दरमहा ११० रुपये भरावे लागतील. विशेष म्हणजे, या योजनेत फक्त शेतकरीच खातं उघडू शकतात.

पंतप्रधान लघु व्यापारी मानधन योजना
लघु उद्योग करणाऱ्यांना वृद्धापकाळात मदत मिळण्यासाठी केंद्राने पंतप्रधान लघु व्यापारी मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेतही वयाच्या ६० वर्षांनंतर खातेधारकाला दरमहा ३ हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळतात. १८ वर्षीय लघु व्यापाऱ्यानं या योजनेत खातं उघडलं तर त्याला दरमहा फक्त ५५ रुपये जमा करावे लागतील. तर ३० वर्षांवरील खातेधारकाला ११० रु. जमा करावे लागतील.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची सुरुवात केली होती. मुख्यत्वे लघु उद्योजकांसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत खातं उघडण्यासाठी संपूर्ण देशात ३.२५ लाख सेवा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे आयकर भरणाऱ्या उद्योजकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासोबत वय वर्ष ४० पेक्षा अधिक असणाऱ्यांचंही खातं उघडता येत नाही. जवळच्या सेवा केंद्राची ऑनलाइन पद्धतीनं माहिती मिळवून तुम्ही नोंदणी करु शकता.