नांदेड : “बेटी बचाव, बेटी पढाव” चा फज्जा, सत्ताधाऱ्यांनीच दिली तिलांजली !

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) – जिल्हा परिषद अस्तित्वात येण्यापुर्वीपासूनच “जि. प. कन्या शाळा, उर्दू व मराठी”ची मालकी असलेल्या शाळा ईमारतीच्या भूखंडावर किनवट नगर परिषदेने आरेरावी करुन अतिक्रमण करुन गिळंकृत करण्याचा घाट घातला आहे. “बेटी बचाव – बेटी पढाव” प्रधानसेवकांच्या या धोरणात्मक ब्रीदवाक्याला खुलेआम भाजपच्याच सत्ताधा-यांनी तिलांजली दिली आहे. शाळा प्रशासनाने न. प. प्रशासनाविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत शिक्षणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. यालाच म्हणायचे काय, “नारी सन्मान” ?

किनवट नगर परिषदेची नविन ईमारत उभारण्यापूर्वी नागरी दवाखान्याला लागून असलेल्या जि. प. च्या कन्या (उर्दू) शाळेच्या ईमारतीवर हातोडा फिरवून ईमारत भूईसपाट केली आहे. आज काही विद्यार्थीनींना गोकुंदा येथील जि. प. शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागला. ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. उर्दू कन्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत मुली शिक्षण घेत होत्या. तर मराठी कन्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थीनी शिक्षण घेत होत्या.

तालुक्यात जि. प. ची ही पहिली शाळा अस्तित्वात आलेली आहे. तशी तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच ते निजाम राजवटीतही ही शाळा होती. त्या परकीयांनी या शाळेवर हातोडा फिरवून शाळा ईमारत पाडून भूखंड गिळंकृत केला नव्हता. परंतु किनवट न. प. ने मात्र कशाचीही पर्वा न करता एकतर्फी हातोडा चालवून जि. प. शाळेच्या मालकिचा भूखंड हडप केला आहे.

खरे तर, ज्या न. प. च्या हद्दीत अशा शाळा अस्तित्वात असून शाळेसाठी ईमारत उपलब्ध नसेल अशा शाळांना न. प. ने ईमारत उपलब्ध करुन देण्याचा शासन दंडक असल्याचे संकेत आहेत. या ठिकाणी मात्र उलट दिसते. पंधरा वर्षापूर्वी काही काळ न. प. ने नाममात्र शुल्क आकारुन गरीब स्तरातील रोग्यांना दवाखाना चालवून सेवा देण्याचे पूण्यकर्म केले होते. ती सेवा आज अस्तित्वात नाही हे विशेष.

जि. प. कन्या शाळा (ऊर्दू व मराठी) प्रशासनाची आजही मालकी असून रितसर शिक्षण करा सह विविध कर ते भरतात. तरी देखील न. प. ने असा व्यवहार का करावा ? न. प. च्या एकूणच मालकी भूखंडापैकी किती मालमत्ता शासनकर्त्यांनी सुरक्षीत ठेवल्या आहेत ? असा विकासप्रेमी नागरिकांचा सवाल आहे. कन्या शाळा प्रशासनाने मालमत्ता वाचवण्यासाठी पुढे येऊन कार्यवाहीचा बडगा उगारणे काळाची गरज आहे. लेक वाचवा-लेक शिकवा या ब्रीदवाक्याला सक्षम साथ द्यायची नसेल तर किमान त्या मुलींच्या मुलभूत शैक्षणीक पायावर लाथ तरी मारु नका, अशी शिक्षणप्रेमींनी आर्त हाक दिली आहे.