नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात बँकिंग क्षेत्रात घोटाळ्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक नामांकित बँकांचे घोटाळे उघड झाल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बँकेने ज्या बँकेवर निर्बंध लादले आहेत ती एक को-ऑपरेटिव्ह सेक्टर बँक आहे. या बँकेतून 6 महिन्यांपर्यंत पैसे काढण्यावर आरबीआयने बंदी घातली आहे.
नाशिकच्या ‘इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’वर आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती स्थिर नसल्याचे कारण देत आरबीआयने ही कारवाई केली आहे. बँकेवर निर्बंध घातल्याने खातेदाराला बँकेतून पैसे काढण्याची परवानगी नसणार आहे. म्हणजेच आता खातेदार बँकेतून पैसे काढू शकणार नाहीत. तसेच ‘इंडिपेंडन्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’चे सुमारे 99.88 टक्के खातेदार ‘डिपॉझिट इन्शुरन्स एँड गॅरंटी कॉर्पोरेशन’च्या विमा सुरक्षेसाठी पात्र आहेत. या विमा सुरक्षा योजनेंतर्गत बँकेच्या खातेदाराला 5 लाख रुपयांपर्यंत जमा रकमेवर विमा सुरक्षा दिली जाते. मात्र, आरबीआयने बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. आरबीआयकडून हा आदेश 10 फेब्रुवारीलाच दिला गेला आहे.
बचत/चालू खात्यात पैसे भरताही येणार नाहीत
बँकेची सध्याची स्थिती पाहता बँकेच्या खातेदाराला बचत किंवा चालू खात्यातून पैसे काढणे अथवा जमा करण्याला परवानगी नसेल. याशिवाय काही नियम आणि अटींनुसार खातेदार कर्जाची रक्कम फेडू शकतील, असेही आदेशात म्हटले आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांनाही अधिकार नाही
बँकेच्या अधिकाऱ्यांनाही गुंतवणूक करणे, मोठी रक्कम देणे किंवा कर्ज मंजूर करणे यांसारखे अधिकार नसणार आहेत. तसेच जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत बँकेवर अशाच प्रकारचे निर्बंध लागू राहतील, असेही आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.