10 वी पास उमेदवारांना खुशखबर ! रेल्वेत नोकरीची ‘सुवर्ण’संधी, परीक्षेविना होणार ‘निवड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती आयोगाने (आरआरसी) २७९२ अ‍ॅपरेंटिस जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकतात. आरआरसीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार, ५मार्च ते ४ एप्रिल दरम्यान या पदांसाठी आपण अर्ज करू शकता. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.

अ‍ॅपरेंटिस पदांसाठी आठवी/दहावी आणि आयटीआयमध्ये आलेल्या गुणांनुसार निवड करण्यात येणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १५ ते २४ वर्ष असणं अनिवार्य आहे. दहावीसोबतच उमेदवार आयटीआयची परीक्षा कमीत कमी ५० गुणांसह उतीर्ण झालेला असावा. तसेच एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. जनरल आणि ओबीसी उमेदवारांना अर्जाचं शुल्क १०० रूपये असेल.

दरम्यान, केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी सहा लाख ८३ हजार पदं रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ही पदं भरण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येणार असून काही दिवसांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. UPSC मार्फत ४३९९ आणि SSC मार्फत १३९९५ पदं केंद्र सरकार लवकरच भरणार आहे. तसेच लवकरच आरआरबी अंतर्गत १,१६,३९१ पदे भरली जाणार आहेत.