RSS Chief Mohan Bhagwat On Cast System | धर्मशास्त्राला जातीगत विषमता अमान्य, जातीव्यवस्था हद्दपार व्हावी : मोहन भागवत

नागपूर : RSS Chief Mohan Bhagwat On Cast System | आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. ते विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने वा. वि. मिराशी सभागृहात आयोजित ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

डॉ. मोहन भागवत म्हणाले, जी जात नाही, ती जात.. हे विधान आजपर्यंत अनेकदा अनेक चर्चासत्रांमधून,
भाषणांमधून आणि पुस्तकांमधून आपल्या वाचनात, ऐकण्यात आणि चर्चेत आले आहे.
मात्र, आता ही जातव्यवस्था घालवायला हवी.
ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्या गोष्टींचे समूळ उच्चाटन आता करायला हवे.
त्यांच्या या विधानाची आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे.

भागवत म्हणाले, सामाजिक एकता हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता.
पण नंतर त्याचा विसर पडला आणि त्यामुळे समाजाला गंभीर परिणाम भोगावे लागले.
जर आज कुणी जातीव्यवस्था किंवा वर्णव्यवस्थेविषयी विचारणा केली, तर ‘तो आता भूतकाळ आहे,
तो आपण विसरायला हवा’, असंच उत्तर येईल.

ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात.
आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले.
परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले.
त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही.

Web Title :- RSS Chief Mohan Bhagwat On Cast System | rss chief mohan bhagwat on cast system in india should be discarded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा