NIA ची टीम ठाण्यात ! हिरेन यांच्या हत्येचा घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याचा आदेश ठाणे न्यायालयाने दिला. आता एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. तत्पूर्वी एसआयटीने या हत्येचा तपास पूर्णत्त्वाकडे नेहला आहे. दरम्यान एनआयएने हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असून गुरुवारी सायंकाळी मुख्य आरोपी सचिन वाझेला गायमुख आणि मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसरात आणून खून नेमका कशा प्रकारे करण्यात आला याची माहिती आणि घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांचे पथक वाझेला बरोबर घेऊन हिरेन यांचा मृतदेह मिळालेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ तसेच या खाडीपासून ४०० मीटर अलीकडे असलेल्या ठिकाणी गेले होते. यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी हत्येनंतर मनसुख यांचा मृतदेह घटनास्थळापासून ४०० मीटर अलीकडे टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच विनायक शिंदेने तावडे असे नाव सांगत घोडबंदर रोडवरील गायमुख खाडीजवळ मनसुख यांना भेटला होता. त्या ठिकाणीही सुरुवातीला वाझेला नेण्यात आले. त्यानंतर मुंब्रा रेतीबंदर खाडीपाशी काही काळ वाझे याची चौकशी केल्यानंतर हे पथक त्याला घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने परत गेले. एटीएसचे पथक दोनच दिवसांपूर्वी विनायक शिंदेला घेऊन घटनास्थळी गेले होते. वाझेला खून प्रकरणात ३ एप्रिलपर्यंत एनआयएची कोठडी न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे एनआयएचे पथक खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी ठाण्यातील सर्व घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय, जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हत्या प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का, याचीही चाचपणी केली जात आहे.

बेपत्ता काडतुसांचे काय झाले?

वाझेची घरझडतीमध्ये रिव्हॉल्व्हर आणि केवळ पंचवीस काडतुसे मिळाली होती. मात्र त्याला
सरकारी रिव्हॉल्व्हर आणि ३० काडतुसे देण्यात आली होती. त्यामुळे इतर काडतुसांचे काय झाले? याचीही यावेळी विचारपूस तपासी पथकातील अधिकार्यांनी केली आहे.