ख्रिसमसला मुंबई गारठणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  वातावरणातील बदलामुळे यंदा थंडी अनुभवायला मिळाली नाही. डिसेंबर उजाडला तरी थंडी नुभवता येत नाही. मुंबईचा विचार केलं तर या काळमध्ये मुंबईकर थंडीने कुडकुडत असतात. नाशिक, महाबळेश्वर, माथेरान केव्हाचेच गारठलेले असते. मात्र यंदा डिसेंबर उजाडला तरी मुंबईत थंडीचा पत्ता नाही. अशीच काहीशी परिस्थिती आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटी मात्र मुंबईत किमान तापमान खाली घसरल्यानंतर मुंबईकरांना थंडीची मजा घेता येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.

यावर्षी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टोबर हीटचे चटके बसणार असे वाटले होते, प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. उलट नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे कमाल तापमान खाली-वर झाले. डिसेंबरच्या सुरुवातीला कमाल तापमानात घट होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात अजूनही कमाल तापमानाचा पारा चढाच असून, मुंबईचे कमाल तापमान सरासरी ३४ अंशाच्या आसपास आहे.

दिवाळी आधी मुंबईचे किमान तापमान १९ अंशावर घसरले आणि मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली हाेती. मात्र, वातावरणातील बदलामुळे गायब झालेली थंडी आता डिसेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी परत आलेली नाही. इतक्यात तापमानात घट होण्याची शक्यता कमी असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटी नाताळदरम्यान मुंबईत किमान तापमानात घट होईल. असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दरम्यान, नोव्हेंबरच्या सुरुवातीला दोन दिवस किमान तापमान १९ अंश नोंदविले होते. नोव्हेंबर महिन्यातील कमाल तापमानाशी तुलना करता किमान तापमान अपेक्षेप्रमाणे खाली उतरले नाही. मुंबईत मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले. डिसेंबरच्या शेवटी मुंबईला गारवा जाणवेल. हंगामनिहाय डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात १५ ते १६ अंशावर तापमान खाली येईल. मुंबईत डिसेंबर, जानेवारीत गारठा जाणवेल असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.