अंबानी कुटूंबाला SEBI चा दणका; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा ठोठावला दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – २१ वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे पाच टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक शेअर खरेदी केले गेले होते. त्याची माहिती सेबीला दिली गेली नाही. त्यामुळे आता याप्रकरणी रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता, तसेच अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना यांच्यावर सेबीने करत २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सेबीने ८५ पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. त्यामध्ये असे म्हंटले आहे की, कंपनीमधील आपल्या भागीदारीबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांनी सेबीला योग्य माहिती दिली नव्हती. त्यामुळे कंपनीच्या प्रवर्तकांमधील मुकेश आणि अनिल अंबानींसह त्यांच्या पत्नी नीता आणि टीना यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याशिवाय के. डी. अंबानी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.
सन २००० मध्ये सेबीला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रवर्तक ६.८३ टक्के शेअर खरेदी केल्याचे विवरण देण्यात अपयशी ठरले. मात्र नियमानुसार सेबीला पाच टक्क्यांहून अधिक शेअर खरेदी केल्यास त्याची माहिती देणे आवश्यक होते.

दरम्यान, अंबानी बंधूंमध्ये २००५ मध्ये व्यवसायाची वाटणी झाली होती. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या वाट्याला पेट्रोलियम व्यवसायाशी संबंधित रिलायन्स इंडस्ट्रीज गेली होती. तर अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्सच्या अन्य कंपन्यांची मालकी गेली होती.