‘त्या’ प्रकरणात परमबीर सिंग यांना 9 जूनपर्यंत अटक न करण्याचं राज्य शासनाकडून हायकोर्टाला आश्वासन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी अंतरिम दिलासा दिला होता. सोमवार दि. 24 मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात 9 जून पर्यंत अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत परमबीर सिंग यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या याचिकेवर सुनावणी प्रलंबित असताना, आम्ही राज्य सरकारला त्यांना अटक न करण्याची सूचना करत आहोत. मात्र, ते ही सूचना विचारात घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे आम्ही याचिकाकर्त्यांना येत्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारला निर्देश देत आहोत, असे न्यायमूर्ती एस.जे. काथावाला व न्यायमूर्ती एस.पी. तावडे यांच्या खंडपीठाने म्हटले होते.

परमबीर यांच्यावरील गुन्हा दखलपात्र आहे आणि गंभीर गुन्हा घडल्याचे तक्रारीवरुन दिसून येते. याशिवाय सुरु असलेल्या तपासाआड न्यायालय येऊ शकत नाही. तक्रारदाराने केलेले आरोप 2015-16 मधील आहे. त्या प्रकरणाचे आणि आता या प्रकरणाचा (देशमुख यांच्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा) काहीही संबंध नाही, असे राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले. तर राज्य सरकार आपल्याला मुद्दाम लक्ष्य करुन, आपल्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवत असल्याचा दावा परमबीर सिंग यांचा आहे.

काय आहे प्रकरण ?

भिमराव घाडगे यांना एका खोट्या चकमक प्रकरणात परमबीर सिंग यांनी अडकवले होते. काही बिल्डरांना गुन्ह्यातून वाचवण्यास परमबीर सिंग यांनी घाडगे यांना सांगितले होते. मात्र, त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवू शकत नसल्याचे घाडगे यांनी परमबीर सिंग यांना सांगितले. तसेच बिल्डरांना वाचवण्यास नकार दिला होता. घाडगे हे आपले ऐकत नसल्याने सिंग यांनी घाडगे यांच्या विरोधात कट रचला होता. एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकवले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर घाडगे यांना त्या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष सोडले होते.

घाडगे दांपत्या दीड वर्षे अंडा सेलमध्ये

परमबीर सिंग आणि त्यांच्या जवळच्या सहा व्यक्तिंवर गंभीर स्वरुपाचे पुराव्यासहीत गुन्हे दाखल केल्याने घाडगे यांच्यावर तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. एवढेच नाही तर घाडगे यांच्या पत्नीसह एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखे किंवा आतंकवादी असल्यासारखे दाखवून त्यांना नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. घाडगे यांनी कोणताही गुन्हा केला नसताना त्यांना व त्यांच्या पत्नीला एक वर्ष दोन महिने अंडा सेलमध्ये घालवावी लागली होती.