सुबोध भावे घेऊन येत आहे अजरामर नाटक ‘अश्रूंची झाली फुले’ 

मुंबई :वृत्तसंस्था – प्रा. वसंत कानेटकर लिखित अजरामर नाटक ‘अश्रूंची झाली फुले’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे नाटक अभिनेता सुबोध भावे घेऊन येत आहे. असं त्याने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

गुढीपाडव्याच्या आसपास हे नाटक रंगमंचावर येईल. त्याचे मोजकेच  प्रयोग महाराष्ट्रातल्या गावोगावी करण्याची इच्छा आहे. या नाटकानिमित्त पाच-सहा वर्षांनंतर रंगमंचावर काम करण्याचा आनंद मला मिळणार आहे. पाच-सहा वर्षे नाटकापासून खूप दूर होतो. कारण वेळच नव्हता त्याची तालीम करायला, प्रयोग करायला. आता या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगमंचावर पाऊल ठेवण्याचा विचार आहे. नाटकाचे पन्नासच प्रयोग करणार आहे. एप्रिलमध्ये साधारणपणे नाटक येईल, अशी माहिती सुबोधने दिली. या नाटकातील इतर कलाकार आणि दिग्दर्शका विषयी माहिती लवकरच कळेल असेही त्याने सांगितले.

‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या नाट्यसंपदा संस्थेतर्फे १९६६ मध्ये रंगमंचावर आणले होते. स्वत: पणशीकरांनी २००२ पर्यंत या नाटकाचे ११११ प्रयोग सादर करून ते अजरामर केले होते. शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि त्यात प्रामाणिक माणसांची व शिक्षणाची होणारी गळचेपी ज्वलंत विषय अश्रूंची झाली फुले या नाटकात मांडण्यात आला आहे.