प्रदूषण ‘टाळा’, नाही तर कारखान्यांना कुलूप ‘लावा’ : CM उद्धव ठाकरे

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – डोंबिवलीत प्रदूषण दूर करण्यासाठी सुरक्षा उपकरणे लावा. कारखान्यांना काही बदल करण्याची वेळ किंवा संधी दया. त्यानंतर जर प्रदूषण कमी नाही झाल्यास कारखान्यांना कुलूप लावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी (दि. 6) दिले. डोंबिवलीत प्रदूषणामुळे गुलाबी रस्त्याची पाहणी केल्यावर ते बोलत होते.

प्रशासनाने घातक आणि कमी घातक कारखान्यांची वर्गवारी करावी. अधिकाऱ्यांनी कारखान्यांतून होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी करावी असे त्यांनी बजावले. गुलाबी रसायन रस्त्यावर आले तर कारवाई करा. रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यांची दुरूस्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. रासायनिक कारखाने लोकवस्तीला लागून आहेत. अधिकाऱ्यांनी घातक कारखाने लोकवस्तीपासून लांब नेता येतील का, याची चाचणी करावी. यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी कल्याण – डोंबिवलीतील रस्ते, स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या कामाकरिता 100 कोटींचा निधी देणार असल्याचे जाहीर केले.कल्याण – डोंबिवली महापालिका मुख्यालयात त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त गोविंद बोडके, महापौर विनीता राणे उपस्थित होते.

कल्याण – डोंबिवलीत मी मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच आलो आहे. येथे सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माहिती तपासून सरकारकडून निधी दिला जाईल. रस्ते विकास, शहर स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी सगळ्यात अगोदर 100 कोटींचा निधी देणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु शहरातील सगळेच रस्ते सिमेंट काँक्रिटचे असलेच पाहिजेत, असे नाही असेही त्यांनी म्हटले.