दुर्देवी ! 3 सख्ख्या बहिणीचा मृत्यू, कराड तालुक्यातील घटना

साताराः पोलीसनामा ऑनलाईन – अन्नातून विषबाधा होऊन तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील सैदापूर गावात घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आस्था शिवानंद सासवे (वय-9), आरुषी (वय-8) आणि आयुषी (वय-3 ) अशी मृत्यू झालेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सासवे कुटुंबांनी एकत्रितरित्या जेवण केले. त्यानंतर आईसह या आयुषी, आस्था आणि आरुषी या तिन्ही बहिणींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. यानंतर तीन मुलींची प्रकृती खालावल्याने त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू झाला. मुलींच्या आईची प्रकृती आता स्थीर आहे. घटनेनंतर सासवे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवला असून तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तिन्ही मुलींना अन्नातून विषबाधा झाली असावी, त्यातूनच तिघींचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून घटनेचा तपास करत आहेत.