धक्कादायक ! नणंदेच्या नवर्‍यावर जडला ‘जीव’ अन् तिसर्‍या लग्नासाठी परिवारातील 9 जणांच्या ‘जीवा’वर उठली

भिंड : वृत्तसंस्था –   मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. येथील एका महिलेनं स्वत:च्याच कुटुंबातील ९ जणांना जेवणातून विष दिल्याची घटना घडली. नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेनं हे कृत्य केलं. तिने कुटुंबातील सदस्यांना जेवणातून विष दिल्यावर महिला प्रियकरासोबत पळून गेली. सध्या कुटुंबातल्या सदस्यांवर ग्वाल्हेरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बरासो पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिमार गावात वास्तव्यास असलेल्या रेश्मा नावाच्या महिलेचे तिच्या नणंदेचा नवरा लोहकन खानशी प्रेम संबंध होते. मात्र, सासरची मंडळी त्यांच्यासाठी अडथळा ठरत होती. त्यामुळे प्रेमसंबंधांत आडकाठी करणाऱ्या सासरच्या मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. त्यानंतर रेश्मा आणि लोहकन खान पळून गेले. रेश्माच्या पहिल्या नवऱ्याचा मृत्यू झाला. रेश्माचा दुसरा विवाह तिच्या लहान दीराशी झाला. यानंतर रेश्मा आणि तिच्या नणंदेचा पती लोहकन खान यांचं सूत जुळलं. रेश्माच्या सासरच्या व्यक्तींचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे रेश्मा आणि लोहकननं एक योजना आखली. सासरच्या सर्व मंडळींना संपवण्यासाठी रेश्मानं जेवणात विष मिसळलं. विष मिसळण्यात आलेलं जेवण जेवल्यानंतर सगळेच बेशुद्ध पडले. यानंतर रेश्मा आणि लोहकन यांनी घरातून पळ काढला.

दरम्यान, शेजारच्यांना रेश्माच्या घरातून अनेक तास कोणाचाही आवाज आला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. शेजारचे घरी पोहोचताच सगळे जण बेशुद्धावस्थेत आढळून आले. शेजारच्या व्यक्तींनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना उपचारांसाठी मेहगाव रुग्णालयात नेण्यात आलं. परिस्थिती गंभीर असल्यानं मग सगळ्यांना ग्वाल्हेरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं.