जालना : लग्नाच्या दिवशीच नववधूने प्रियकरासोबत घेतला गळफास, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन – नववधूने लग्नाच्या दिवशीच आपला प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील मालखेडा (ता. भोकरदन) येथे रविवारी (दि. 16) पहाटे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्नेहा राजू आव्हाड (18) आणि नवनाथ सुरेश गायकवाड (21) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ गायकवाड या तरुणाचे मालखेडा येथे रस्त्यावर टायर पंक्चरचा व्यवसाय होता. नवनाथ याचे त्याच्याच नात्यातील स्नेहा आव्हाड या तरुणीसोबत वर्षभरापासून प्रेमसंबंध जुळले होते. आज दुपारी स्नेहाचा विवाह तालुक्यातील कोळेगाव येथील एका तरुणाशी पार पडणार होता. मात्र, विवाहाच्याच दिवशी स्नेहा नवनाथ सोबत पळून गेली. कोळेगाव येथून भल्या पहाटे दोघेजण मालखेडा येथे आले. त्याठिकाणी असलेल्या नवनाथच्या जुन्या घरात दोघांनीही दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.