औरंगाबाद कचरा प्रश्न : आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

औरंगाबाद : कचऱ्याच्या प्रश्नावरुन औरंगाबादमधील पडेगाव मिटमिटामध्ये झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 24 आंदोलकांसह हजार ते बाराशे आंदोलकांवर 307 म्हणजेच हत्या करण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी ज्या खदान परिसरात कचरा टाकण्याची तात्पुरती परवानगी दिली आहे, त्या जागेची आज महानगरपालिका पुन्हा एकदा पाहणी करणार आहे. तर विभागीय आयुक्तही कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची या संदर्भामध्ये एक बैठक घेणार आहेत. पडेगाव मिटमिटा या गावांमध्ये पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला असून तिथे शांतता पसरली आहे.

पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे
कलम गुन्ह्याचे स्वरुप

307 – जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे
143 – बेकायदेशीर जमावाचा घटक असल्याबद्दल शिक्षा
147 – दंगा करण्याबद्दल शिक्षा
148 – प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे
149 – समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल जमावाचा प्रत्येक घटक समान दोषी असणे
324 – घातक हत्यारांनी दुखापत पोहचवणे
341 – गैरनिरोधबद्दल शिक्षा (वाट अडवल्याबद्दल)
436 – घर इत्यादी बद्दल विस्तव अथवा स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक
435 – 100 रुपये किमतीपर्यंत अथवा शेतमालाच्या बाबतीत 10 रुपये किमतीपर्यंत विस्तव अथवा स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक
353 – लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी बलप्रयोग अथवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे
427 – पन्नास रुपये इतक्या रकमेचे नुकसान करुन आगळीक करणे

कचरा प्रश्नाला हिंसक वळण
औरंगाबादेतील गेल्या 21 दिवसांपासून सुरु असलेल्या कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागले. मिटमिटा आणि पडेगावात कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्यांची स्थानिकांनी तोडफोड केली आणि त्या पेटवून दिल्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या.

संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत तीन अधिकारी आणि नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेमुळे महामार्गावर वाहन्यांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. यातील पाच ते सहा खासगी गाड्याही ग्रामस्थांनी फोडल्या. तसंच शंभरपेक्षा अधिक दुचाकींचेही नुकसान झाले होते.