काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
विविध मागण्यांसाठी निघालेला हा शेतकऱ्यांचा मोर्चा सोमवारी मुंबईत धडकला. आझाद मैदानावरुन हे शेतकरी आता विधान भवनावर धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने पाठिंबा दर्शविला आहे.

गारपीट, बोंडअळी, समृद्धी महामार्गात गेलेली जमीन, नद्याजोड प्रकल्पातील विस्थापित, वनजमिनीपासून वंचित झालेले शेतकरी अशा सम दु:खाने होरपळलेले पालघर, ठाणे, अहमदनगर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, सांगली, पुणे, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. तब्बल ३० हजारांहून अधिक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. मात्र, हा मोर्चा नेमका कोणत्या मागण्यासाठी निघतो आहे?
मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या या आहेत मुख्य मागण्या

– शेतीमालाला दीडपट भाव देण्याची हमी द्यावी.
– कसत असलेल्या वन जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात.
– राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी नार-पार, दमणगंगा, पिंजाळ नद्यांचे अरबी समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून पूर्वेकडील गिरणा, गोदावरी खोऱ्याकडे वळवावे.
– गुजरात राज्याच्या फायद्याचा नद्याजोड प्रकल्प रद्द करावा.
– संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना यांचा गरजू आणि पात्र व्यक्तींना तत्काळ लाभ द्यावा.
– ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांच्या जुन्या शिधापत्रिका बदलून द्याव्यात.
– शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी.
– शेतकऱ्यांची वीजदेयके माफ करावी, शेतकऱ्यांना चोवीस तास वीज, पाणी उपलब्ध करावे.
– प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर मिळावे.
– स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी.

इत्यादी प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना अनेक राजकीय संघटना तसेच विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे.