काश्मीर : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेबच्या ये जाण्याची माहिती लष्करातीलच तीन जवान दहशतवाद्यांना देत होते, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
औरंगजेबाच्या हत्येप्रकरणी तीन जवानांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयित आरोपी जवानांकडून सध्या चौकशी सुरू आहे. या तीन जवानांवर औरंगजेबाच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप आहे. दहशतवाद्यांना औरंगजेबाच्या येण्या-जाण्याची सूचना हे तीन जवान दहशतवाद्यांना देत होते, असा लष्कराला संशय आहे. त्या तीन जवानांच्या मदतीनंच दहशतवाद्यांनी औरंगजेबाचा काटा काढल्याची आता चर्चा आहे.
४४ च्या बटालियनच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. गेल्या वर्षी १५ जूनला ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता. ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या औरंगजेब यांनी घरी जाण्यासाठी लष्करी तळावरुन टॅक्सी पकडली होती. ते दक्षिण काश्मीरच्या शोपियानचे रहिवासी होते.