निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी सरकारमधील 4 कॅबिनेट मंत्रीही भाजपच्या गळाला ?

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचा गड उद्धवस्त करण्याचा मानस भाजपने ठेवला आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. तृणमूलचे दिग्गज नेते पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगत असताना ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (दि. 22) बोलवलेल्या कॅबिनेट बैठकीला 4 मंत्र्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वतुर्ळात तर्कवितर्क लढवले जात आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत अनुपस्थितीत राहिलेल्या मंत्र्यांमध्ये पर्यटन मंत्री गौतम देब आणि उत्तर बंगाल विकास मंत्री रवींद्रनाथ घोष यांचाही समावेश होता. घोष यांनी सरकारी सेवा जनतेपर्यंत पोहचवण्यात व्यस्त असल्याचे कारण दिले होते. दार्जिलिंग जिल्ह्यातील पर्यटन मंत्री गौतम देब यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे तर बीरभूमच्या चंद्रनाथ सिन्हा यांनी मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्या आगमी दौऱ्याच्या तयारीत व्यस्त असल्याचे म्हटले होते.

पक्षाचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मंत्र्याची अनुपस्थिती वास्तविक कारण दिसत असली तरी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्या गैर हजरीचे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. पक्षपाताच्या मुद्यावरुन ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली असून कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्यानंतर ते पक्षाला रामराम करण्याची चर्चा आणखी जोर धरु लागली आहे. नोव्हेंबरमध्ये कोलकाता येथील सार्वजनिक बैठकीत बॅनर्जी यांनी पक्षात दुजाभाव होत असल्याचा आरोप केला होता. पक्षात प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्याची संस्कृती दिसत आहे. ही बाब निराशजनक आहे. राजीव बॅनर्जी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले होते.