तेलंगणातील आदिवासी आणि मुसलमानांसाठी आरक्षण वाढवून देण्यास परवानगी न दिल्यामुळे चंद्रशेखर राव यांनी मोदींवर टीका केली. राव तेलंगणातील संगारेड्डी येथील निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, भारत देश हा पंतप्रधान मोदींच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आजोबांच्या मालकीचा नाही. भारत तुमच्या वडिलांचा किंवा आजोबांच्या मालकीचा आहे का? ही लोकशाही आहे. तुम्ही किती दिवस सत्तेवर राहणार आहात.
मी मुस्लिम आरक्षणासाठी केवळ हा प्रस्ताव देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो. केंद्राला यापूर्वी यासंबंधी ३० पत्रेही लिहिली होती. मंत्र्यांनीही दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेऊन प्रस्ताव मंजूर करण्याची शिफारस केली होती. आता ते म्हणत आहेत की, ते हा प्रस्तावही मंजूर करणार नाहीत आणि दुसऱ्यालाही करु देणार नाही. तेलंगणाला तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा बिगर भाजपा, बिगर काँग्रेसचे सरकार केंद्रात येईल, असे राव म्हणाले. यापूर्वीही काँग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या आई-वडिलांचा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. यावर मोदींनीही पलटवार केला होता.