नगरसह राज्यातील बाजार समितीतील ठप्प झालेले कार्यालयीन कामकाज झाले सुरळीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सचिव ते शिपाई पदापर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करुन घ्यावे, या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून बाजार समिती कर्मचाऱ्यांचे सुरु असलेले आंदोलन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले असून २ आठवडे नगरसह राज्यातील बाजार समित्यांतील ठप्प झालेले कार्यालयीन कामकाज सुरळीत आज दुपारपासून सुरळीत झाले असल्याची माहिती नगर बाजार समितीचे निरीक्षक संजय काळे यांनी दिली.

मुंबई येथील आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कृति समितीच्या वतीने २७ जुलैपासून धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देण्यासाठी नगर बाजार समितीतील सर्व कर्मचारी दि. १ ऑगस्ट पासून बेमुदत सामुहिक रजेवर गेले होते. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे बाजार समितीचे कार्यालयीन कामकाज पुर्णत: ठप्प झाले होते.

या कर्मचाऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करत धरणे आंदोलन केले. तसेच आमदार, मंत्री यांना निवेदने दिली होती. शासन याची दखल घेत नसल्याने मंगळवारी मुंबईत धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, कृति समितीचे निलेश दिंडे, पुरुषोत्तम खंडागळे, शिवाजी मगर यांच्या शिष्टमंडळास पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी चर्चेला बोलावून निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे बाजार समिती कर्मचाऱ्यांनी गेल्या १५ दिवसांपासून सुरु केलेले आंदोलन स्थगित करत कार्यालयीन कामकाज सुरु केले असल्याचे संजय काळे यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –