औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद शहरात रस्ते,वीज, पाणी यांच्याबरोबरच प्रदूषण आणि कचऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. ऐतिहासिक परंपरा असलेल्या या शहराचे आज ‘कचराबाद’ झाले आहे. शहराच्या या बकाल अवस्थेला शिवसेनेला जबाबदार ठरवीत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लिहिलं आहे. तसेच “पक्षीय विरोध विसरून एकत्रपणे केला तर अधिक सोयीचे होईल. आपण दोघे, कोणत्या दोन भिन्न राजकीय पक्षाचे आहोत, याकडे दुर्लक्ष करून या विकासाच्या वाटेवर सामुदायिक प्रयत्न करणेच आवश्यक आहे” असे देखील जलील यांनी पत्राद्वारे म्हंटले आहे.
‘औरंगाबाद महापालिकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिवसेना सत्तेवर आहे. शहरात रस्ते, वीज, पाणी यांची दुरावस्था आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने भासत आहे, प्रदूषणाच्यादृष्टीने हे शहर अत्यंत बकाल झाले आहे. या बकाल अवस्थेमुळेच औरंगाबादचे नाव “कचराबाद”असे झाले आहे. औरंगाबादच्या या बकाल अवस्थेस शिवसेना जबाबदार आहे, असे आपल्याला नाही वाटत का?’ असा सवाल जलील यांनी केला आहे.
या पत्रातील भावना माझ्या एकट्याचा नसून तमाम औरंगाबादकरांच्या आणि औरंगाबादवर निस्सीम प्रेम करणार्या नागरिकांच्या आहेत, असे जलील यांनी लिहिलं आहे. तसेच औरंगाबाद शहराच्या विकासासाठी मी प्रयत्न करत असून आपणही पक्षीय विरोध विसरून एकत्र यावे, असे आवाहन जलील यांनी आपल्या या पत्रद्वारे केले आहे.
औरंगाबाद महापालिकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिवसेना सत्तेवर आहे.आपल्याला असे नाही वाटत का, की शिवसेना औरंगाबादच्या बकाल अवस्थेत जबाबदार आहे? औरंगाबाद शहरात रस्ते, वीज, पाणी यांची दुरावस्था आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने भासत आहे, प्रदूषणाच्यादृष्टीने हे शहर अत्यंत बकाल झाले आहे. या बकाल अवस्थेमुळेच औरंगाबादचे नाव “कचराबाद”असे झाले आहे. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या शहर “कचराबाद” होणे,हे योग्य वाटते का? महापालिकेच्या शाळांची तर अत्यंत दुरवस्था आहे.
ह्या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे? औरंगाबाद शहराचे नाव दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. औद्योगिकदृष्ट्या व जागतिक पर्यटनाच्यादृष्टीने एकेकाळी प्रगत असलेले, नावाजलेले हे शहर आज प्रगत शहरांच्या क्रमवारीत खालच्या स्थानावर आहे, त्याची क्रमवारी घसरली आहे व सातत्याने घसरतच आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटक येईनासे झाले. पर्यटकांची संख्या सातत्याने रोडावत आहे. हे असे का होत आहे? उत्तर अतिशय साधे व सरळ आहे.
आदित्य, तुमच्या पक्षाच्या नेत्यांना या शहराच्या विकासाच्यादृष्टीने “टॉप प्रायॉरिटीज” काय असाव्यात? याचे भान राहिलेले नाही. कोणत्या कामांना किती प्राधान्य द्यायचे? त्याची किती जबाबदारी घ्यायची? याचे भान देखील राहिलेले नाही. त्यांच्यादृष्टीने “सत्तेत असणे” म्हणजे केवळ आपल्या झोळ्या भरणे आणि आपला स्वार्थ साधणे हा आहे. शहराचे काय वाटोळे झाले तरी चालेल, असे त्यांचे वागणे असते.