राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या परिवर्तन निर्धार यात्रेसाठी पवार आज नगरमध्ये आले होते. त्यानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पवार यांचे लक्ष नवाब मालिक यांच्या वक्तव्याकडे वेधले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांचे मलिक यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.
अजित पवार म्हणाले की, अण्णा हजारे यांनी आमच्या सत्ताकाळातही आंदोलने केली. त्यावेळी आम्ही वेळोवेळी आंदोलनाची दखल घेतली. आंदोलन ताणले नाही. मात्र सध्याचे भाजपप्रणित सरकार अजूनही अण्णांच्या आंदोलनाकडे फिरकले नाही. भाजपचे मंत्री महाजन यांना आंदोलनस्थळी येण्यास अण्णांनी नकार दिला. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्रीच अण्णांना भेटायला येणार असल्याची माहिती आपल्या कानावर आली असल्याचेही पवार म्हणाले.