‘अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा’, काँग्रेसच्या नेत्याची गृहमंत्री अनिल देशमुखांकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी BARC चे ( ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल) माजी सीईओ पार्थो दास गुप्ता आणि यांच्यातील WhatsApp संवाद समाजमाध्यमामध्ये व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. याची माहिती गोस्वामींना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या चॅटमधून स्पष्ट दिसते. ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली? हा देशद्रोहाचा प्रकार असून गोस्वामींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

याबाबत सावंत यांनी मंगळवारी (दि. 19) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन गोस्वामीवर कारवाईची मागणी केली आहे. संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे, हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली, ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी कशी काय मिळाली ? त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्यांनी स्वतः सांगितले आहे की, ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

गोस्वामी यांचे कृत्य हे कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचेही ते म्हणाले.