टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण ! आता मयांक आणि अश्विन जायबंदी, भारतीय संघाच्या अडचणीत भर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिडनीच्या क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात(Test match) भारताला दुखापतींचा मोठा फटका बसत आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतीच्या चक्रात अडकत आहेत. दोन महिन्यापासून ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघातील आतापर्यंत 9 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यातच आता मयांक आणि आर. अश्विन यांनाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

नेटमध्ये सराव करताना मयांक अगरवालच्या हाताला दुखापत झाली आहे. मयांकची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सामन्याआधी फिटनेस चाचणीनंतर निर्णय होणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या हनुमा विहारीच्या जागी मयांकला संधी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता मयांकही दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत भर पडली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी साडेतीन तास मैदानात फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळणारा अश्विनही दुखापग्रस्त असल्याचे समजते. सिडनी कसोटीनंतर अश्विनचा पाठदुखीचा त्रास वाढला आहे. बुमराह आणि अश्विन बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. आता बुमराहनंतर अश्विनलाही दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. अश्विनला दोन दिवस पुर्णपणे आराम देण्यात येणार आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्याआधी बुमराह, मयांक आगरवाल आणि अश्विन यांची फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर अंतिम 11 जणांची निवड करण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापग्रस्त झालेले खेळाडू –
मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मयांक अगरवाल आणि आर. अश्विन आदी.