क्रिकेटर श्रीसंत वरील आजीवन बंदी उठवली, पुढच्या वर्षी खेळण्याची शक्यता ?

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शांताकुमारन श्रीसंत यांच्यावरील आजीवन बंदी उठवून सात वर्षांची करण्यात आली आहे. यामुळे आता श्रीसंथवरील बंदी पुढील वर्षी उठणार असून 13 सप्टेंबर 2020 रोजी त्याच्यावरील हि बंदी उठणार आहे.

बीसीसीआयच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात त्याच्यावरील हि बंदी कमी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. श्रीसंथ याच्यावर मॅच फिक्सिंग प्रकरणी 13 सप्टेंबर 2013 त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

याआधी सुप्रीम कोर्टाने मार्च 2019 मध्ये त्याच्यावरील आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेला आजीवन प्रतिबंध उठवला होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला त्याच्यावर घालण्यात आलेल्या आजीवन प्रतिबंध प्रकरणी विचार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर श्रीसंथ याने आपल्या बंदीवर भाष्य करताना म्हटले होते कि, मी लिअँडर पेस याला आदर्श मानत असून तो 45 व्या वर्षी ग्रँडस्लॅम खेळू शकतो.

नेहरा 38 व्या वर्षी  वर्ल्डकप मध्ये खेळू शकतो तर मी क्रिकेट का खेळू शकत नाही. मी तर आता 36 वर्षाचा असून माझी ट्रेनिंग अजूनही सुरु आहे. त्यामुळे मी आताही क्रिकेट खेळू शकतो.

दरम्यान, जुलै 2015 मध्ये  श्रीसंथ,अंकित चव्हाण आणि अजीत चंदीला यांच्यावर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी निर्दोष सोडण्यात आले होते. श्रीसंथ याने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी 27 कसोटी सामन्यांत 87 विकेट तर 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट घेतल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त