Beed Riots Case | बीड जाळपोळ प्रकरण : फडणवीस-पाटील यांच्यात खडाजंगी! पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली? पप्पू शिंदे कोण?
नागपूर : मराठा आंदोलनात बीड आणि माजलगावमध्ये झालेल्या जाळपोळीवरून (Beed Riots Case) आज विधानसभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. जाळपोळ होत असताना पोलीस तिथे होते, पण त्यांनी बघ्याची भूमिका का घेतली? पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही? पप्पू शिंदेचे लागेबंधे कुणाशी आहेत? गुप्तचर यंत्रणेला याची माहिती नव्हती का? असे प्रश्न जयंत पाटील यांनी विचारले. यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी गृहमंत्र्यांनी पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. (Beed Riots Case)
बीड जाळपोळ प्रकरणी सभागृहात जयंत पाटील म्हणाले, बीड पोलीस अधीक्षकांना (Beed Superintendent of Police) जिल्ह्यात काहीतरी होऊ शकते अशी वॉर्निंग होती. त्यांना कळवण्यात आले होते. त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला. सकाळी माजलगावला प्रकाश सोळंकींच्या घराला आग लावली. त्यावेळी तिथे फुटेजमध्ये पोलीस दिसत आहेत. बीड शहर जळत असताना पोलीस अधीक्षक बीडला आले नाहीत.
पोलीस कमी होते हे जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यावर मी हे सांगेन की पोलीस लोकसंख्येच्या तुलनेत कमीच असतात. त्यांना जरब बसण्यासाठी हवेत गोळीबार का केला नाही? पोलीस ५० च असतात ५ हजारचा मॉब असला तरीही. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन जरब का बसवली नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय जाळले. जयदत्त क्षीरसागर, सोळंकी यांची घरे जाळली. शहरात जमाव फिरत होता. नंबर दिले होते आणि सगळे फिरत होते. शहरात जमाव फिरत होता. विधानसभेच्या सदस्यांना आपण संरक्षण देऊ शकत नाही तर लोकांचा प्रश्नच येत नाही.
माझा प्रश्न आहे की गोपनीय शाखेला ही माहिती होती. संपूर्ण माहिती होती, मी स्वतः सात-आठ वेळा फोन केला. त्यांनी फोन घेतला नाही. संदीप क्षीरसागर यांच्या घरात मुले आणि पत्नी होती. त्यासाठी फोन करत होतो. पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली तरीही ती स्थापन झालेली नाही. याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. (Beed Riots Case)
अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला त्याची न्यायालयीन चौकशी करा ही मागणीही करण्यात आली. मॉब फिरत होता तेव्हा फायरिंग केले असते तर जमाव पांगला असता. पप्पू शिंदे नावाचा एक को ओर्डिनेटर आहे. तो एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा भाचा आहे. पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरची गँग हे घडवत होती. भुजबळांनी व्यक्त केलेली भावना योग्यच आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील भुजबळ गेले पण गृहमंत्री का गेले नाहीत?
बैठक झाली तेव्हा त्यात काय झाले? पप्पू शिंदेचे लागेबांधे कुणाशी आहेत ते फडणवीसांनी सांगावे. पप्पू शिंदे कुणाचा माणूस आहे ते फडणवीसांनी खासगीत सांगावे कारण ते सभागृहात सांगू शकणार नाहीत. सराईत गुन्हेगार सापडले म्हणत आहेत. तर मग पोलिसांना ते दिसले नव्हते का? पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम का केला नाही? महाराष्ट्रातील पोलीस बघ्याच्या भूमिकेत का आहेत? पोलीस अशा गोष्टी थांबवत नसतील तर दुर्दैव आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळला आहे हे या घटनेने दाखवले. पप्पू शिंदे आणि गँग यांचे लागेबांधे देखील स्पष्ट झाले पाहिजेत, असे जयंत पाटील म्हणाले.
यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयंत पाटील यांना मी सांगू इच्छितो तुम्ही कागदपत्रे पडताळून पाहा. कुठलीही माहिती किंवा अलर्ट पोलिसांनी मिळाला नव्हता. जी काही क्लिप वगैरे झाली ती वेगळी होती. मॉब नंतर गेला, बीडचा कुठलाही इंटलिजन्स नव्हता. बीडमध्ये पोलिसांनी गोळीबार का केला नाही? हे तुम्ही म्हणता पण पोलिसांनी परिस्थिती पाहून निर्णय घेतला असेल.
अंतरवली सराटीत ७० पोलीस जखमी झाले तेव्हा जो लाठीचार्ज केला त्यावर राज्यातल्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केले. जयंत पाटील यांची भावना योग्य आहे. यामध्ये कडक कारवाई करता आली असती. पाच हजार लोकांचा मॉब आहे. आपणही गृहमंत्री होतात आपल्याला कल्पना आहे.
एके ठिकाणी पाच हजार लोक होते आणि एके ठिकाणी दीड हजार लोक होते.
तुम्ही तिकडे नव्हतात तुम्हाला काय माहीत आहे? सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळे थोडेच येते? एफआयआरमध्ये
अनेकांची नावे नाहीत. नंतर कारवाई केली जाते. एफआयआरमध्ये सगळ्या गोष्टी त्यात नसतात.
त्यामुळे जयंत पाटील यांना सांगू इच्छितो की अधिकची कारवाई व्हायला हवी होती.
मी पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती. पण एका लेव्हलला तपास पोहचला आहे.
माझी हरकत नाही पुढच्या दोन दिवसात एसआयटी स्थापन करु जर सभागृहाची इच्छा आहे तर.
दुसरे असे की जयंत पाटील यांनी पप्पू शिंदेबाबतच का विचारले? मी नावे सांगू? फोटो दाखवू? याला राजकीय वळण देऊ
नका. सुरज चुंगडे कोण आहे? शिराळे कोण आहे? असे नको ना? हा राजकीय विषय नाही.
माझ्याकडे सगळे फोटो आहेत कुणाबरोबर कोण उभे आहे. जे काही घडले आहे त्यावर कारवाई करणारच.
कुठल्याही आरोपीला सोडणार नाही म्हणजे नाही, असे फडणवीस म्हणाले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा