‘भंडाऱ्यातील घटना मन हेलावून टाकणारी’; PM मोदीही हळहळले

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – देशवासीयांच्या काळजाच पाणी करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा (Bhandara) जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री लागलेल्या आगीतून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi)  यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील घटना ही मन हेलावून टाकणारी असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असे मोदी यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या घटनेची तात्काळ चौकशी करावी, असे निर्देश दिले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

घटना अत्यंत वेदनादायी – राहुल गांधी
भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना सर्वोतोपरी मदत करावी, असे गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मृत्युमुखी पडलेली बालल एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचे त्याठिकाणी कामावर असल्याचे नर्सच्या लक्षात आले. त्यावेळी तिने दार उघडून पाहिले असता, अतिदक्षता विभागात धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यानंतर तातडीने रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती दिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढले.