‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात शो सुरू असताना भारत गणेशपुरे यांचा एक डायलाॅग आहे त्यावरून हे प्रकरण निर्माण झाले आहे. भारत गणेशपुरे त्यांच्यासोबतच्या कलाकाराला उद्देशून बोलताना एक डायलॉग म्हणाले होते. “ट्रेनमध्ये जसे आलेपाकवाले घुसतात, तसा तू माझ्या घरामध्ये घुसला आहेस”. परंतु भारत गणेशपुरे अलिबागबद्दल आक्षेपार्ह बोलले असल्याचा दावा अलिबागमधील रहिवाशांनी केला. यानंतर भारत गणेशपुरे यांनी माफी मागावी अशी मागणी अलिबागकरांनी केली होती. यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे.
गणेशपुरे यांच्या शोनंतर अलिबागमधील रहिवाशांनी त्यांना फोन करून त्यांच्या त्या डायलाॅगबद्दल जाब विचारला. यावर भाष्य करताना गणेशपुरे म्हणाले की, “मी अलिबाग नव्हे तर आलेपाकवाले ट्रेनमध्ये घुसखोरी करतात, असे म्हणालो होतो. हवं तर तुम्ही माझा संवाद पुन्हा एकदा ऐका”. असे गणेशपुरे म्हटले.
यानंतर त्यांची विनंती लक्षात घेत आलिबागकरांनी गणेशपुरे यांचा तो डायलाॅग पुन्हा ऐकला. त्यानंतर आलिबाग नव्हे तर आलेपाक असा उल्लेख असल्याची खात्री आलिबागकरांना झाली. त्यामुळे या डायलाॅगमुळे होत असलेला वाद थोडक्यात निवळला.