पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दीर्घायू ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने साकारण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक भवन हे राज्यातील एक आदर्श उदाहरण असून, जिल्हाभरात आवश्यक त्या ठिकाणी असे ज्येष्ठ नागरिक निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज लासलगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते पार पडले, या वेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी सरपंच कुसूमताई होळकर, प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, उपअभियंता ढिकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश पाटील, लासलगाव ग्रामपंचायत प्रशासक सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. त्यानंतर विकासकामांना सुरुवात केली. मात्र, लगेचच कोरोनाचं संकट ओढावलं गेले. अशा वेळी नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाच्या वतीने प्राधान्य देण्यात आले. या काळात महसूल, आरोग्य, पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने आहोरात्र काम केले. जोपर्यंत लस उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत सर्वांनी आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. यामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर या शासनाने केलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोना विषाणूची दाहकता तेवढीच आहे. मात्र, सर्व स्तरावर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाने हळूहळू विकासकामांना निधी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नक्की विकासकामे सुरू होतील. अधिकारी वर्गानेही मंजूर झालेल्या निधीची कामे तात्काळ पूर्ण करावीत.

कोरोनाचं संकटात राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाशी संबंधित अधिकारी कर्मचारी वर्ग चोवीस तास कामात होते. त्यामुळे दरमहा ३.५ लाख टन ते ९ लाख टनांपर्यंत रेशनचे वाटप करण्यात यश आले. यामध्ये प्रामुख्याने गरीब जनता, मोलमजुरी करणारे नोकरदार वर्ग तसेच परप्रांतीय यांचा समावेश होता. आपल्या राज्याने माणूस हा घटक समोर ठेवून कोरोना विषाणूचा मुकाबला केला. गोरगरीब जनता अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी शिवभोजन केंद्रातून आपण भूक भागविण्यासाठी प्रयत्न केले. यात १० रुपये दर असलेली शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये केली. केंद्रचालकांनी काही गरीब लोकांना मोफत जेवण दिले असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिली.

लासलगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचे काम पूर्णत्वाकडे असून, सहा महिन्यांत हा पूल व रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी खुला करण्यात येईल. लासलगाव परिसरातील पाण्याच्या प्रश्नाबातत शासन स्तरावर काम सुरू असून, येथील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. गावाच्या विकासासाठी लासलगाव बाजार समितीने हातभार लावावा, असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडी म्हणजे सरकारची तीन चाके आणि नागरिकांचे एक चाक अशी चारचाकी असलेले वाहन आहे आणि ते आता विकासकामांच्या बाबतीत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुसाट सुटणार असून, वर्षानुवर्षे ती धावणार आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जयदत्त होळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते विकासकामे करत असताना अतिक्रमणात ज्या अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांची घरे गेली होती, त्यांना कायमस्वरूपी घरे देऊन त्यांचे सातबारा उतारे प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले.