पराभव दिसल्याने ममतांचा ‘जळफळाट’ ; अमित शहांचा ममतांवर पलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल कोलकात्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या तुफान राड्यानंतर आज अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. पराभव दिसल्याने ममतांचा जळफळाट होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काल रात्री या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांना गुंड म्हटले होते. यावर देखील अमित शहा यांनी पलटवार केला आहे.

त्याचप्रमाणे पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातच आम्ही ३०० जागांचा आकडा पार केला असून पुन्हा एकदा आम्ही बहुमताचे सरकार बनवू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचा प्रतिहल्ला अमित शहा यांनी केला आहे. त्याचबरोबर पोलिसांवर देखील त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असा आरोप करत जर सीआरपीएफचे जवान नसते जर वाचलो नसतो असा गंभीर आरोप अमित शहांनी या पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, पराभव दिसत असल्यानेच तृणमूल काँग्रेस अशा प्रकारचे हल्ले करत असल्याचे अमित शहा यांनी म्हटले. तर हा हल्ला विद्यासागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.