कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील मेट्रोकामाबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देत मोठा दणका दिलाय. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारसाठी हा मोठा दणका मानला जातोय.

मुंबई उच्च न्यायालयाने ‘एमएमआरडीए’ला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भूखंड आहे त्या स्थितीत ठेवण्यास सांगितलंय. यासोबत जागेच्या हस्तांतरणावर देखील न्यायालयाने स्थगिती आणली. या निर्णयानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री यांच्यावर टीका केली जातेय. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी ठाकरे सरकारवर टीका करत त्यांची खिल्ली उडवली.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचं वैशिट्य काय? देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती देणे. अशा सरकारने घेतलेल्या मनमानी निर्णयांची न्यायालयाकडून फजिती होते’, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरे यांची विविध विषयांवरून एकाच ट्विटमध्ये खिल्ली उडवलीय.

माझा पेपर, माझी मुलाखत इतरांची कशाला आफत? ‘फेसबुक लाईव्ह’वर माझी बांग मेरे बाप की एकही टांग! माझे सरकार, माझी स्थगिती दररोज न्यायालयाचा बांबू आणि दररोज फजिती !!!, असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार याच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय.

कांजूरमार्ग कारशेड स्थगिती मुद्द्यावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी भाष्य केले. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुद्द्यावर ठाकरे सरकारला सल्लाही दिला. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम हे केलं पाहिजे.

मेट्रोच्या कामासाठी लागणारा पैसा हा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचे काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प 2024 पर्यंत लांबेल. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? या कामात जेवढा उशीर होईल तितकं नुकसान होईल.

मागील वर्षभर हे काम रखडलंय. त्यामुळे आता आरेमध्ये तात्काळ कारशेडचं काम सुरू करण्यात यावं, असा सल्ला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी दिलाय.