वरळीतील मालमत्ता कर वसुलीत तब्बल 100 कोटींचा घोटाळा; ‘या’ काँग्रेस नेत्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात १०० कोटींच्या खंडणीचा विषय चर्चेत असतानाच आता मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातील (Tax Assessment and Collection Department) काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा धक्कादायक आणि गंभीर आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केला आहे. वरळी परिसरात मालमत्ता कर वसुलीत तब्बल १०० कोटींचा, तर पूर्ण मुंबईत ७०० ते ८०० कोटींचा हा घोटाळा असल्याचा दावा करत, या प्रकरणाचा तपास करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रवी राजा यांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली.

तर, या प्रकरणावरून जागा मालक, महापालिका अधिकारी यांच्या संगनमताने हा ७००-८०० कोटींचा मालमत्ता कर वसूली घोटाळा झाला असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. तसेच राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेत असतानाही महापालिकेत मात्र काँग्रेसने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा प्रशासनावर अंकुशच राहिलेला नाही, त्यामुळे कर्मचारी असे घोटाळे करीत आहेत. पालिकेत चांगले काही काम झाले तर त्याचे श्रेय स्वतः घेतात, स्वतःची पाठ थोपटतात. त्याप्रमाणे ही जबाबदारीही सत्ताधाऱ्यांचीच आहे. विरोधी पक्षात असल्याने मुंबईकरांच्या भल्यासाठी असे भ्रष्टाचार उकरून काढतच राहू, असा इशाराही काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महानगरपालिकेने तीव्र कारवाई सुरू केली असून, जी दक्षिण विभागातील वरळी, परळ या परिसरातील अनेक ठिकाणी मिलच्या मोक्याच्या आणि व्यावसायिक जागा आहेत. या मिल मालकांकडून मालमत्ता करापोटी महापालिकेला कोट्यावधी रुपये येणे आहे. परंतु, अधिकारी मालमत्ता कर आकारणी करताना आणि त्यांची देयके संबंधित जागा मालकांना पाठवताना त्यांच्या जागेचे आकारमान व त्यांचे किमंत कमी दाखवतात. त्यामुळे त्यांचा मालमत्ता कर हा काही कोटींऐवजी काही लाखांत आकारला जातो. याचा मोठा आर्थिक फटका महानगरपालिकेला बसत असून संबंधित महापालिका अधिकारी गब्बर होत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून होताना दिसत आहे.