३ भारतीय अंतराळवीर करणार ७ दिवस अवकाशात मुक्काम 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ मोहिमेसाठी केंद्र सरकारने तब्बल दहा हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. अशा रीतीने इस्त्रोच्या मिशन गगनयानला केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दाखवला आहे. या मोहिमेनुसार ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात सात दिवस मुक्काम ठोकणार असून मानवाला अंतराळात पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

२०२२ पर्यंत पूर्ण होणार मिशन
येत्या ४० दिवसात हे मिशन सुरू होणार आहे. जगातील इतर देशही सॅटेलाइट लॉन्च करण्यासाटी इस्रोची मदत घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच मिशन गगनयानची घोषणा केली होती. हे मिशन २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली होती. या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भारताने रशिया आणि फ्रान्सबरोबर करार केला आहे.

इस्त्रोने पुढच्या वर्षी ५० हून अधिक अवकाश मिशन हाती घेतले आहेत. अंतराळ मोहिमेसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पातील तरतूद वाढवली आहे, असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इस्त्रोने क्रू एस्केप सिस्टीम म्हणजे कॅप्सूलची यशस्वी चाचणी केली होती. त्यानुसार अंतराळवीर आता त्यांच्यासोबत काही लोकांना अंतराळात घेऊन जाऊ शकणार आहेत.

१० चाचण्या होणार
ही गगनयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अंतराळात जाणाऱ्या एका व्यक्तिच्या कमीत कमी चाचण्या घेण्यात येणार आहेत. या शिवाय २०२२ पर्यंत गगनयान अंतराळात पाठवणार असल्याचं इस्रोचे प्रमुख सिवन यांनी आधीच सांगितलं आहे. त्याआधी २०२० आणि २०२१ मध्ये दोन मानवरहित यानही अवकाशात पाठवण्यात येणार आहे.