आंबेडकरांचे तैलचित्र मंत्रालयात लावायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का ? – मुंडे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र मंत्रालयात लावण्यासाठी मुंख्यमंत्र्यांकडे वेळ नाही का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. मंत्रालयाच्या इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यासंदर्भात वर्षभरापूर्वी प्रशासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात आली. परंतु या प्रस्तावार अजूनही काही पाऊल न उचलल्याने अद्याप हा प्रस्ताव प्रलंबित पडला आहे. म्हणूनच धनंजय मुंडे यांनी सदर सवाल उपस्थित केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्रासह संविधानाचे प्रास्ताविकदेखील मंत्रालयाच्या इमारतीत लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, असेही मुंडे यांनी सांगितले. इतकेच नाही तर आज संविधान दिनानिमित्त विधानपरिषदेत सभापतींनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे यांनी हा महत्वाचा विषय उपस्थित केला.

काय म्हणाले मुंडे ?
धनंजय मुंडे म्हणाले की, “मंत्रालायची इमारत ही अशी शासकीय इमारत आहे ज्या ज्या इमारतीतून राज्याचा कारभार पाहिला जातो, आणि अशा  शासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे तैलचित्र लावणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा उचित सन्मान होणार आहे. परंतु यागोष्टीसाठी मुंख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. संविधान दिनाचे औचित्य साधून आजच डॉ. बाबासाहेबांचे व संविधानाच्या प्रास्ताविकाचे तैलचित्र मंत्रालय इमारतीत लावावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.